अलुतेदार बलुतेदारांना गृहीत धरून योजना बनवावी - प्रकाश आंबेडकर
पुणे:(प्रतिनिधी/राजकुमार भंडारी) दि.१७ - कोरोनामुळे राज्यातील अर्थव्यवस्था कोलमडली असून ही अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रयत्नशील आहेत. त्यापैकी एक योजना आखण्यात येत असून त्यात अलुतेदार बलुतेदार यांना गृहीत धरण्यात आलेले नाही. त्यामुळे अशा आर्थिक योजना राबविताना अलुतेदार, बलुतेदार यांना गृहीत धरून या योजना आखण्यात याव्यात, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात आल्याचे मुखमंत्र्यांनी आज स्पष्ट केले आहे. गेले अडीच महिने सलग लॉक डाऊन असल्याने राज्यातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. आर्थिक उत्पन्न बंद झाल्याने राज्य शासन अडचणीत आले आहे. त्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून राज्य शासन प्रयत्नशील असून त्यासाठी एक योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत अलुतेदार, बलुतेदार यांना गृहीत धरण्यात आलेले नाही. राज्यात यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असतानाही त्यांना गृहीत धरून त्यांच्यासाठी या योजना केल्या जातात असे कुठेही दिसत नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. शिंपी, लोहार, सोनार, कुंभार यांना कसल्याही प्रकारच्या सोयी सुविधा आतापर्यंत देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की आपण ज्यावेळेस आर्थिक पॅकेज तयार करणार त्यात अलुतेदार, बलुतेदारांसाठी आर्थिक नियोजन करावे. शिवाय हा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जाईल याची काळजी घ्यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
0 Comments