अनुदानाच्या मागणीसाठी प्राध्यापकानी फुंकले ऑगस्ट क्रांतीचे रणशिंग
जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आक्रोश निवेदन
लातुर:(प्रतिनिधी) विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय यातील प्राध्यापक यांनी अनुदानासाठी आता आक्रमक भूमिका घेतली असून प्राध्यापक बांधव आपल्या हक्काच्या पगारासाठी रस्त्यावर उतरले असून आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना आक्रोश निवेदन देण्यात आले. आतापर्यंत शासनाने नुसते आश्वासन दिले ,मार्च अधिवेशनात अनुदान तरतूदही करण्यात आली पण प्रत्यक्ष हक्काचं पगार मात्र कागदावरच राहिला कोरोना महामारीत या शिक्षकांना उपजिवीकेसाठीचे सर्व काम बंद असल्याने उपासमार होत आहे. याच कालखंडात अनुदान निधी वितरणासाठी शासनाकडे उपोषणाच्या माध्यमातून विनंत्या सुध्दा केल्या परंतु हा घटक मागील २० वर्षापासून आपल्या हक्कासाठी वंचित राहिला आहे.याच न्याय मागणी साठी गजानन खैरे यांनी २७ जुलै पासून अन्नत्याग सहीत औरंगाबाद ते मुंबई पायी दिंडी काढलेली आहे. न्याय मागण्यासाठी कृती संघटना संपूर्ण राज्यात ४ ऑगस्ट पासून अनुदानासाठी पुन्हा एकदा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बांधवांनी महाएल्गार पुकारला आहे. जोपर्यंत अनुदान वितरण शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आता माघार नाही असा पवित्रा घेतला आहे. यामध्ये १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णय नुसार प्रचलित नियमानुसार अनुदान वितरणाचा शासन निर्णय काढावा त्याचबरोबर अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा,महाविद्यालय यांना घोषित करून सोबतच अनुदान द्यावे अशा विविध मागण्या संदर्भाचे आक्रोश निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री,अर्थमंत्री, आणि शिक्षण मंत्री यांना देण्यात आले.येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदान वितरणाचा शासन निर्णय निर्गमित झाला नाही तर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटनेने संपूर्ण राज्यात ९ ऑगस्ट पासून रस्त्यावर उतरून आमरण उपोषण करणार व याची सर्व जबाबदारी ही शासनावर असेल अशा इशारा यावेळी संघटनेने दिला आहे. यावेळी लातुर विभाग अध्यक्ष प्रा. संतोष उपासे, प्रा. नितीनजी सेलुकर, प्रा. गंगाधर पाचेगावकर, यांच्यासह प्राध्यापक बांधव उपस्थित होते.
0 Comments