गरीब व गरजू लोकांसाठी शिवभोजन थाळी मोफत उपलब्ध्
लातूर:(जिमाका) दि. 15 - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी इत्यादींच्या जेवणाअभावी हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळीची किंमत दि. 30 मार्च 2020 पासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी रु. 5/- एवढी निश्चित करण्यात आली होती. सदर मुदत मंत्रिमंडळाच्या मान्यतेने वेळोवेळी वाढविण्यात आली आहे. “ब्रेक द चेन” ची प्रक्रिया राज्यभरु सुरु झालेली आहे. या कालावधीत गरीब व गरजू लोकांचे जेवणाअभावी हाल-अपेष्टा होऊ नये म्हणून शिवभोजन थाळी पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी मोफत उपलब्ध् करुन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार दि. 15 एप्रिल 2021 पासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी शिवभोजन थाळी मोफत उपलब्ध् करुन देण्यात येत आहे. तसेच या कालावधीत संपूर्ण राज्याचा शिवभोजन थाळीचा इष्टांक 2 लक्ष प्रतिदिन एवढा राहील. शिवभोजन केंद्रचालक व ग्राहक यांना दिलेल्या मार्गदर्शक सूचना यथास्थितीत अंमलात राहतील. सर्व उपनियंत्रक शिधावाटप, जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी व तहसीलदार यांनी तात्काळ शिवभोजन केंद्र चालकांच्या निदर्शनास आणून त्याची अंमलबजावणी करावी असे सहसचिव, महाराष्ट्र शासन चारुशीला तांबेकर यांनी परिपत्रकाव्दारे कळविले आहे.

0 Comments