संततधार पावसामुळे नादुरुस्त रस्ते, नाली दुरुस्ती साठी धावले माजी,भावी नेते
शेख बी जी.
औसा: नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले तेव्हा शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. पण राज्य शासनाने या निवडणुका लांबणीवर टाकल्या. तेव्हा या चर्चा कमी झाल्या. निसर्गाने सलग आठ ते दहा दिवस पावसाला सुरुवात केली. या पावसात अविकसित भागातील नादुरुस्त रस्ते व नाल्यांची अवस्था किती दयनीय आहे हे चित्र वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेसमोर आले.किंबहुना आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांनी ते दाखवण्याचा प्रयत्नही केला. शहरात अनेक भागात नाल्या नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहत असतानाचे चित्र होते. या पावसात माजी व भावी नेत्यांनी सर्वतोपरीने मदत करण्याचा प्रयत्न केला.
35 वर्षानंतर शहराची हद्द वाढ झाल्याने अनेक भागात मूलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल दिसून आले. भविष्यात आपणास फायदा होईल या आशेने काही इच्छुक मंडळींनी जनतेच्या सेवेसाठी पुढाकार घेतला व काहींनी नाली सफाई केली तर काहींनी स्वखर्चातून मुरूम टाकून कच्चा रस्ता बनवून दिला. घरात शिरणारे पाणी व्यवस्थित नाली मध्ये सोडण्यासाठी धावपळ केली. पाण्यात भिजत आपल्या जनतेची काळजी घेण्याचा प्रयत्न या नेतेमंडळी कडून झाल्याचे चित्र शहरात दिसून येत होते. भविष्यात निवडणुकीत जनता कोणाच्या पाठीमागे जाईल हे सांगता येत नाही. मात्र सद्यस्थितीमध्ये अनेकांची होणारे हाल कमी वेळेत दूर होत असल्याचे चित्र शहरात आहे.
या कामाबरोबरच प्रसार माध्यमांवर शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. एकमेकांच्या कुरघोड्या करणे सुरू झाले असल्याचे चित्र दिसते.
निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने जाईल सांगता येत नसले तरी निवडणूक रंगतदार होईल अशी चर्चा शहरात सुरू आहे.
0 Comments