लातूर जिल्हा झाडीदार बनविण्यासाठी सज्ज व्हा...!!
लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
24 जुलै ला मांजरा नदीच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून... या मोहिमेची होणार सुरुवात
11:00 वाजून 11:00 मिनिटांनी 28 हजार वृक्षाची होणार लागवड
लातूर:(जिमाका) दि. 20 - लातूर जिल्ह्यातील वन क्षेत्र केवळ 7,900 हेक्टर आहे. जिल्ह्याच्या क्षेत्रफळाचा विचार करता वृक्षाच्छादीत क्षेत्र केवळ पॉईंट नऊ टक्के एवढे आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करण्याची पर्यावरणीय गरज आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रत्येक गावात कमीत कमी अडीच हेक्टर क्षेत्र वृक्षाच्छादीत ( ऑक्सिजन पार्क ) करण्याचा संकल्प केला असून त्याची सुरुवात रविवार दि.24 जुलै रोजी मांजरा नदीच्या दुतर्फा एकाच वेळी 11 वाजून 11 मिनिटांनी 28 हजार वृक्ष लागवड करून केली जाणार आहे. या मोहिमेत स्वखुशीने नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
एक झाड किती महत्वाचे
एक पूर्ण वाढलेले झाड 117.9 किलो ग्राम एवढा ऑक्सिजन वर्षाला सोडते. तर तेच झाड 48 पौंड (1 किलो म्हणजे 2.20 पौंड ) एवढी दूषित हवा ( कार्बनडायऑक्ससाईड ) शोषून घेते. प्रत्येक माणसाला वर्षभरात जवळपास 9.5 टन एवढा ऑक्सिजन लागतो. यासाठी प्रत्येक माणसाला किमान सात झाडं लागतात. मानवी जीवनासाठी झाड खूप महत्वाची भूमिका बजावतं म्हणून झाडे असतील तर आपण आहोत, झाडामुळे जैविक साखळी टिकेल. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी अतिशय दक्ष राहून वृक्ष लागवड करावी. लावलेलं प्रत्येक वृक्ष जगेल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहनही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
लातूर तालुक्यातील भातखेडा येथे 2 हजार रोपे, सोनवती येथे 2 हजार रोपे, धनेगाव येथे 4 हजार रोपे, शिवणी खुर्द येथे 550 रोपे, भातांगळी येथे 3 हजार 500, भाडगाव येथे 1 हजार, रमजानपूर येथे 1 हजार 500, उमरगा येथे 2 हजार, बोकनगाव येथे 2 हजार 300, सलगरा बु. 4 हजार 100, बिंदगीहाळ 500, औसा तालुक्यातील शिवणी बु. 3 हजार, तोंडवळी येथे 2 हजार, होळी येथे 2 हजार असे गावनिहाय वृक्ष लागवड होणार आहे.
0 Comments