गरजूंना अन्नधान्याची मदत तर लाईट बिल माफ करण्यासाठी वंचितकडून निवेदन
बीड:(प्रतिनिधी/तुकाराम गुरसाळे) दि. ३- कोरोना काळात लॉक डाऊन असल्याकारणाने अनेकांना आपल्या गावी स्थलांतर करावे लागले. शिवाय काम बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अशा लोकांना बीड, गेवराई मधील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अन्नधान्याचे किट तसेच मास्कचे वाटप केले. त्याच बरोबर गेवराई मध्ये मागील तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे म्हणून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की गरजू लोकांना शक्य ती मदत करण्यात यावी, त्याच बरोबर महामार्गावरून गावी जाणाऱ्या लोकांना जेवण, पाणी आणि विश्रांतीची सोय करण्यात यावी. या आवाहनाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बीड मधील गेवराई तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ही प्रतिसाद देत महामार्गावर अन्नदान केले, शिवाय लॉकडाऊन असल्याने गरजूंना अन्नधान्याचे कीट आणि मास्कचे वाटप करण्यात आले. वंचितचे गेवराई तालुका अध्यक्ष सय्यद सुभान यांनी हा उपक्रम राबवला असून तालुक्यात अनेकांकडे लाईट बिल भरायला पैसे नाहीत म्हणून गेल्या तीन महिन्याचे लाईट बिल माफ करण्यात यावे, यासाठी गेवराई तहसीलदार प्रशांत जाधवर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष सय्यद सुभान, युवक तालुकाध्यक्ष बंटी सौंदरमल, सतीश प्रधान, सुधाकर केदार, शरद खापरे उपस्थित होते.
0 Comments