Latest News

6/recent/ticker-posts

नळेगाव येथील रेशीम शेतीची जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्याकडून पाहणी

नळेगाव येथील रेशीम शेतीची जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्याकडून पाहणी


लातूर:(जिमाका) दि. 13 - जिल्हयात रेशीम शेती करण्यासाठी महा रेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले नांव नोंदणी करुन  रेशीम शेती करावी असे आवाहन जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी केले. चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गोविंद रामा अलूरे या शेतकऱ्याच्या एक एकर तुती लागवड केलेल्या रेशीम शेती पाहणी प्रसंगी त्यांनी केले. या रेशीम शेती पाहणी वेळी उपसंचालक (आत्मा ) पाटील, रेशीम विकास अधिकारी एन.बी. बावगे, परिसरातील  शेतकरी उपस्थित होते. यावेळी  जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज म्हणाले की, जिल्हयात रेशीम शेती करण्यास वाव असून रेशीम कोषाला सोन्याचा भाव आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले नांव नोंदणी करुन रेशीम शेती करण्याचे आवाहन केले. मागील वर्षी  राबविण्यात आलेल्या महा रेशीम अभियान 2020 मध्ये लातूर जिल्हा हा महाराष्ट्रात क्रमांक तीन वर होता. या वर्षी आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. असे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी रेशीम अधिकारी बावगे म्हणाले की, मनरेगा अंतर्गत एक एकर तुती लागवडीचे अंदाज पत्रक 3 लाख 23 हजार 790 तीन वर्षात दिले जाते. यासाठी लाभार्थी हा अल्पभूधारक असावा व शासन निर्णयानुसार एका गावात कमीत कमी 10 शेतकऱ्यांनी रेशीम शेती करणे गरजेचे आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना (पेाखरा) या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना एक एकर तुती लागवड,किटक संगोपन गृह बांधकाम व किटक संगोपन साहित्य या करिता साधारण लाभार्थ्यांना 2 लाख 20 हजार 229 रुपये व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थी करीता 2 लाख 64 हजार 275 रुपये दिले जाते. या करीता बहू भूधारक  लाभार्थी देखील लाभ घेऊ शकतात. इतर व्यावसायीक  पिकापेक्षा रेशीम शेतीमध्ये एक महिन्यात शेतकऱ्यास जास्त उत्पन्न मिळते. तसेच तुतीचा पाला शेतकरी  जनावरांना पशु खाद्य म्हणून देऊ शकतात असे ही बावगे यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments