Latest News

6/recent/ticker-posts

अशिहरा कराटे व स्पोर्ट केम्पो राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

अशिहरा कराटे व स्पोर्ट केम्पो राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

नळेगाव : स्पोर्ट केम्पो महाराष्ट्र असोसिएशन व अशिहरा कराटे असोसिएशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लातूर जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या सहकार्याने आयोजित अशिहरा कराटे व स्पोर्ट केम्पो राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी नळेगाव येथील ग्रामपंचायत सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत १५० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेत आपले कराटे कौशल्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नळेगावचे सरपंच सूर्यकांत चव्हाण होते. उद्घाटन चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून खेळाडूंना प्रेरणा दिली. प्रमुख उपस्थितांमध्ये अनिल चव्हाण (जिल्हाध्यक्ष, सेवादल), अलीमसाब तांबोळी (अध्यक्ष, स्पोर्ट केम्पो महाराष्ट्र), के. वाय. पटवेकर (सचिव), संतोष तेलंगे (सचिव, अशिहरा कराटे लातूर), नामदेव शिंगडे (सरपंच, देवग्राम), मारोती भुत्ते, दयानंद मानखेडे, अनिकेत शेंडगे, दिलीप मानखेडे, अमजद घोरवाडे, दाऊद बागवान, गुंडेराव मोरकांडे, प्रमोद हुडगे, राजू शेलार, पत्रकार दयानंद सूर्यवंशी व सुनील भोसले यांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली. स्पर्धेत काता आणि कुमिते व स्पोर्ट टेम्पो फाईट प्रकारांमध्ये खेळाडूंनी चित्तथरारक सादरीकरण केले. प्रथम व द्वितीय क्रमांकाची पारितोषिके लातूरच्या दोन संघांनी पटकावली, तर तृतीय क्रमांक मोहोळ (जि. सोलापूर) येथील संघाने पटकावला. विजेत्यांना सन्मानचिन्ह, पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी (अध्यक्ष, अशिहरा कराटे इंडिया व स्पोर्ट केम्पो इंडिया) होते. त्यांनी आपल्या भाषणात कराटे खेळाचे शारीरिक, मानसिक व आत्मरक्षणाच्या दृष्टीने महत्त्व विशद केले. अनिल चव्हाण यांनी कराटे खेळामधून आत्मविश्वास व धैर्य निर्माण होत असल्याचे नमूद करत, युवकांनी खेळात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या वेळी सी. ए. तांबोळी यांना "मराठी अस्मितेचा इशारा" वृत्तपत्र परिवारा तर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

पंचमंडळामध्ये अश्फाक तांबोळी, अजमीर शेख, विक्रम गायकवाड, रेहान शेख, जैद सय्यद, विश्वजीत येनकुरे, बालाजी राजमाने, अर्चना राठोड यांनी काम पाहिले. प्रस्ताविक के. वाय. पटवेकर, सूत्रसंचालन चेतन चव्हाण आणि आभारप्रदर्शन संतोष तेलंगे यांनी केले. स्पर्धा ही केवळ खेळ नव्हे, तर कला, कौशल्य व शिस्तीचा संगम ठरली.

Post a Comment

0 Comments