मांजरा प्रकल्पातील वाढत्या विसर्गामुळे लातूर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा
लातूर : दि. २९ - मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पातून मांजरा नदीत वेळोवेळी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. २८ आणि २९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रात सध्या १५ हजार ७२४ क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून, यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मांजरा आणि तिच्या उपनद्यांच्या काठावरील गावांतील नागरिक, शेतकरी आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या सर्वांना सतर्क राहण्याचे आणि विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, आपली मालमत्ता आणि जनावरे यांची काळजी घ्यावी, तसेच पाण्याच्या वेढ्यात अडकणार नाही याची खबरदारी घ्यावी. दुभती आणि इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्रोताजवळ किंवा विद्युत खांबाजवळ बांधू नयेत, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. जलसाठ्याजवळ किंवा नदीकाठी जाण्याचे टाळावे. मुलांना पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याबाबत जागरूक करावे. पुलावरून किंवा नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही पूल किंवा नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे. पावसादरम्यान विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यापासून दूर राहावे, असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.
0 Comments