मृतदेहाची अदलाबदल झाल्याने, अंत्यविधी करण्यात आलेला मृतदेह काढला बाहेर
चाकूर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील अजब आणि गलथान कारभारामुळे मृतदेहाची आदलाबदल झाल्यानंतर तालुक्यातील मौजे शेळगाव येथे अंत्यविधी करण्यात आलेला मृतदेह जमिनीतून जेसीबीने उकरून बाहेर काढण्यात आला व त्यांच्या नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आला आहे.ही घटना गुरूवारी दिनांक सहा मे रोजी घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शेळगाव येथील धोंडीराम सदाशिव तोंडारे (वय ६५) यांना मागील आठवड्यात कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर उदगीर येथे उपचार करून लातूर येथील कै. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी दिनांक पाच मे रोजी सायंकाळी त्यांचे निधन झाल्यानंतर नातेवाईकांनी गुरूवारी सकाळी त्यांचा मृत्यदेह गावाकडे आणला व त्यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार केले. याच दरम्यान बीड जिल्यातील अंबाजोगाई तालुक्यातील मौजे हातोला येथील आबासाहेब सखाराम चव्हाण (वय ४५) यांचाही मृत्यु झालेला होता. वैदयकीय महाविद्यालयातील गलथान कारभारामुळे शेळगावच्या तोंडारे यांच्या नातेवाईकांकडे चव्हाण यांचा मृतदेह देण्यात आला, मृतदेहाची खात्री कोणीही केली नाही. त्याच्यावर अंत्यंसस्कार करण्यात आले. सकाळी चव्हाण यांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली. यानंतर नातेवाईकांनी तोंडारे यांचा मृतदेह सोबत घेऊन शेळगाव गाठले , त्यांनी तोंडारे यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून चव्हाण यांचा पुरलेला मृतदेह काढून घेतला आणि हातोल्याकडे रवाना झाले. यानंतर तोंडारे यांच्या मृत्यदेहावर नातेवाईकांनी अत्यंसंस्कार केले आहेत. कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रुग्णावर लातूर महानगरपालीके कडून अंत्यसंस्कार केले जात होते.माञ असे असतानाही अनेक मृतदेह स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता गावाकडे अंत्यविधीसाठी आणले जात आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अजब आणि गलथान कारभारामुळे नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन सहन करावा लागला आहे.

0 Comments