Latest News

6/recent/ticker-posts

भादा परिसरात अवकाळीचा दणका,शेतकऱ्यांचा मोडला आर्थिक मनका!

भादा परिसरात अवकाळीचा दणका,शेतकऱ्यांचा मोडला आर्थिक मनका!


बी डी उबाळे

औसा : तालुक्यातील भादा व परिसरामध्ये शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी दुपारी तीनच्या दरम्यान अचानक सुरू झालेल्या जोरदार वादळामुळे आणि विजाच्या कडकडाट भादा व परिसरातील वृक्ष झाडे मोठ्या प्रमाणात मोडून पडली तर आंबा या फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

तालुक्यातील भादा व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फळांचा राजा आंबा या फळ पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली असून या पिकावरच अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून आहे परंतु मागेही अनेक वेळा वादळ वारा होऊन आणि वातावरणातील विविध बदलामुळे आंबा या पिकावर सतत समस्यांची संक्रांत येत असतानाच शनिवारी झालेल्या या जोरदार विजजाच्या कडकडाट,वादळामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून आंबा ही फळे झाडाचे तुटून मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाल्याने झाडावरती अगदी मोजकेच फळे शिल्लक राहिल्याचे दिसून येत येत आहे. आणि फांद्या मोठ्या प्रमाणात मोडून पडल्याचे चित्र सध्या औसा तालुक्यातील भादा व  परिसरामध्ये दिसून येत आहे.

यामुळे भादा येथील अंबा लागवड शेतकरी दयानंद काशिनाथ माळी यांनी आंबा फळ पिकाची नुकसान झाल्याची माहिती कळविली असून त्यासोबतच त्यांचे शेजारी असलेली बाग रामानंद साधू माळी,योगेश रामानंद माळी व इतर सर्व आंबा फळ उत्पादक शेतकऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजत असून भादा कृषी सहाय्यक सुरेखाताई गव्हाणे, सज्जाचे तलाठी राम दुधभाते यांनी रविवारी सकाळी पाहणी करणार असल्याचे सदरील प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. औसा तालुक्यामध्ये आज झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फळपिकांचे झाले नुकसान

औसा तालुक्यामध्ये सर्वदूर अवकाळी पाऊस पडला. यामध्ये विविध फळ पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. औसा तालुक्यामध्ये मागील पंधरवड्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट यामुळे आंबा, द्राक्ष, पपई व केळी या पिकांचे ९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे.तर शनिवारी झालेल्या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे यामध्ये आत्ता भर पडलेली आहे‌. आंबा या फळपिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कृषि विभागामार्फत मिळालेली आहे. वीज आणि वादळी वारे सुरू असताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन तालुका कृषि अधिकारी औसा ढाकणे यांच्यामार्फत करण्यात येत आहे. नुकसान झालेल्या फळपिकांची पाहणी कृषि विभागामार्फत त्वरित करण्यात येईल असेही तालुका कृषि अधिकारी यांनी सदर प्रतिनिधीस बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments